महसूल मंत्री थोरात यांच्या कार्याचा डंका वाजवायलाच हवा; पण वाजविणार कोण? ज्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ते भलत्याच कामात व्यस्त
विश्लेषण | अनंत पांगारकर
महसूल मंत्री थोरात यांच्या कार्याचा डंका वाजवायलाच हवा; पण वाजविणार कोण?
ज्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ते भलत्याच कामात व्यस्त
संगमनेर: संगमनेरच्या राजकारणाला एक चांगली परंपरा आहे. संगमनेरकरांचे लोक प्रतिनिधीत्व करण्याची संधी देखील आत्तापर्यंतच्या आमदारांना दीर्घकाळ मिळाली आहे. या सर्वांनीच राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचे काम सध्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात करत आहेत. संगमनेरकरांच्या या नेतृत्वाची कामगिरी राज्यात सरस ठरत असली तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजविण्यात स्थानिक कार्यकर्ते मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच संगमनेरात येणारे राज्यातील व देशातील नेते थोरात यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांचे काम कार्यकर्त्यांनी पुढे नेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसतात.
वर्षाच्या सरतेशेवटी संगमनेर नगरपरिषदेच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि गृह मंत्री सतेज पाटील संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांचे विधानसभेत व विधान परिषदेत विविध आमदारांना कसे मार्गदर्शन होते, याची माहिती दिली. तसेच ह्या नेतृत्वाने केलेल्या कामाची व्याप्ती मोठी असून त्यांच्या कर्तृत्वाचा डंका वाजविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, अशी अपेक्षा या दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केली होती. याशिवाय संगमनेरात आलेले केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेते देखील थोरात यांच्या कार्याचा गौरव करताना तसेच काँग्रेस पक्षाचे भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघताना दिसतात. त्यामुळे या नेतृत्वाला सर्वत्र पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर प्रामुख्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर आहे.
नेतृत्व संगमनेरातच नव्हे तर राज्यात चमकदार कामगिरी करत असले तरी त्यांची कामगिरी लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर असते. मात्र संगमनेरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून असे घडतांना दिसत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री पदासारखे महत्त्वाचे खाते सांभाळतानाच संबंधित खात्याशी सलग्न निर्णय घेऊन समाजाभिमुख काम करत असताना या कामाचे अनुकरण राजस्थान, गुजरातसारख्या राज्यात होत असतानादेखील कार्यकर्ते त्यांच्या कामाचा डंका वाजविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. केवळ स्वतःच्या वाढदिवसाचे गल्लोगल्लीत फ्लेक्स लावणे, आपसात पदाधिकाऱ्यांची उणीदुणी काढणे, ठेकेदारी करणे, थोरात यांच्यासह अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध विभागांची कामे मिळविणे अशीच कामे करताना दिसतात. या कामातून मिळणाऱ्या प्रचंड पैशातील काही पैसा या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या प्रसिद्धीसाठी जरी खर्च केला तरी मंत्री थोरात यांचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकते. अनेकदा समाजमाध्यमांवर थोरात विरोधकांचे थोरातांवर टिकेचे वारु उधळलेले असतांनादेखील थोरात समर्थकांकडून त्यांना उत्तर देण्याऐवजी केवळ बघ्याची भुमिका घेतली जाते. त्यामुळे वारंवार तीच गोष्ट बिंबविली जात असल्याने त्यात अनेकांना खरेपणा वाटु लागतो मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.
मंत्री थोरात यांच्यासह आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख या सर्वांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संगमनेरमध्ये आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा संच येथे असल्याने बऱ्याचदा मंत्री थोरात देखील या कार्यकर्त्यांना 'आग्यामोहोळ' असे संबोधित असतात. राज्याच्या राजकारणात थोरात यांची प्रतिमा संयमी नेतृत्व अशी असली तरी नगर जिल्ह्यात मात्र थोरात विखे संघर्ष नेहमी बघायला मिळतो. या संघर्षात देखील कार्यकर्ते बर्याचदा कमी पडले आहेत. थोरात यांनी आपल्या संयमी नेतृत्वातुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तसेच केंद्रीय पातळीवर अनेक मित्र जोडले आहेत. या माध्यमातून त्यांनी मोठा निधीदेखील संगमनेरच्या विकासासाठी आणला. यातून संगमनेरात उभी राहिलेली विकास कामे अन्य शहरांच्या तुलनेत डोळ्यात भरणारी आणि इतरांसाठी अनुकरणीय ठरली आहे.
संगमनेरने आत्तापर्यंत उच्चशिक्षित आणि प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व दीर्घकाळासाठी दिले आहे. यापूर्वी दत्ता देशमुख, बी. जे. खताळ पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी दीर्घकाळासाठी संगमनेर चे नेतृत्व केल्यानंतर १९८५ पासून आजपर्यंत संगमनेरकरांनी थोरात यांना नेहमीच मताधिक्याने निवडून दिले. याची दखल पक्षात देखील घेतली गेली आणि थोरात यांना सन्मानाची पदे मिळाली. थोरात यांनीदेखील आपली जबाबदारी पार पाडली. मात्र सध्या त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांविषयी समाजातील अनेक घटकांमधून नाराजीचा सूर आहे. त्यांच्याभोवती असलेले कार्यकर्ते केवळ पदांच्या लालसेने, ठेकेदारी अथवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जमा झालेले दिसतात. वास्तविक ज्या नेतृत्वाच्या जोरावर आपण आपली प्रगती साधतो त्या नेतृत्वाला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीदेखील या कार्यकर्त्यांनी उचलणे गरजेचे आहे. हीच अपेक्षा.
Very good
उत्तर द्याहटवाThanks
हटवाउत्तम लेख ,वस्तुस्थिती योग्य मांडलेली
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाधन्यवाद
हटवा