खताळ यांनी शेतकर्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला
मधुकर नवले यांचे प्रतीपादन
संगमनेर,
माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे काम निष्पृह होते. सहकार, शिक्षण अश्या विविध संस्थांची पायाभरणी करतांना त्यांनी कधीही स्वतःला स्वार्थाचा लवलेश लागू दिला नाही. ज्या संस्थांची त्यांनी निर्मीती केली त्या सर्व त्यांनी लोकांच्या मालकीच्या केल्या. मंत्रीपदाच्या काळात राज्यात अनेक धरणांची निर्मीती करुन त्यांनी लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले. यातुन अनेक कोरडवाहु शेतकर्यांच्या शेतीचे नंदनवन झाल्याने त्यांनी खर्या अर्थाने शेतकर्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला, असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी केले.
ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी, माजी मंत्री डॉ. बी. जे. खताळ यांच्या तिसर्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी योगवर्धीनी संगमनेरचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पेटकर होते. यावेळी प्राचार्य सहदेव चौधरी, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंन्टे, जनसेवाचे अध्यक्ष साहेबराव वलवे, विठ्ठल शेवाळे, वसंतराव देशमुख, विक्रमसिंह खताळपाटील, रावसाहेब डुबे, भास्करराव खताळ आदी उपस्थित होते.
माजी मंत्री खताळ यांचा जीवनपट उलगडून दाखवितांना नवले म्हणाले, खताळ यांच्याकडे एक युगपुरुष म्हणून बघितले पाहिजेत. ते पक्के इंदिरा कॉग्रेसच्या विचारांचे असले तरी गाडीतल्या आणि माडीतल्या कॉग्रेस त्यांना मान्य नसे. घराणेशाही तर मुळीच मान्य नव्हती. वयाच्या सरतेशेवटी सहा पुस्तके लिहणार्या खताळ यांच्यासारखा निष्कलंक राजकारणी, निष्णात वकील होणे शक्य नाही.
डॉ. पेटकर म्हणाले, नियम आणि कायदा तोडून कोणतेच काम करायचे नाही, हे खताळ पाटील यांचे तत्व खरे लोकशाहीचे मूल्य जोपासणारे होते. सत्तेचा फायदा त्यांनी कधीच स्वतःसाठी व कुटूंबासाठी करुन घेतला नाही. सत्ता ही जनकल्याणासाठी असते, हे त्यांचे ठाम मत होते. माझ्यासारख्या एका शिपायाच्या मुलाला त्यांच्या सानिध्यात डॉक्टर होता आले. त्याकाळी त्यांनी माझ्यासारख्या अनेक मुलांना जीवनात उभे करण्याचे काम केले. त्यामुळे ते एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते.
पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र सेनानी, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील समितीने केले होते. सतिष कानवडे, शरद पावबाके, वैभव लांडगे, रंगनाथ कोकणे, दत्तात्रय कोकणे, उपसरपंच संदीप ठोंबरे, सागर कानवडे आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा